![sanjay raut](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F12%2Fsanjay-raut-vs-trollers.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. यावरून वातावरण तापले असताना कर्नाटकाच्या एका मंत्र्यांने 'मुंबई' केंद्र शासित करण्याची गरळ ओकली आहे. या मंत्र्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. 'मुंबई' केंद्र शासित करण्याची मागणी करणारे कर्नाटकचे मंत्री मूर्ख आहेत, अशा शब्दांत राऊत (Sanjay Raut) यांनी फटकारले आहे. ते आज (दि. २८) पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारचे अस्तित्व बोगस आहे. शिंदे सरकारला महाराष्ट्राविषयी प्रेम नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांकडून पक्षपातीपणा सुरू असल्याचे अधिवेशनात दिसून आले आहे, अशी टीका त्यांनी यावेळी राहुल नार्वेकर यांच्यावर केली.
शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप अधिवेशनात करण्यात आले आहेत. यावर राऊत म्हणाले की, आमच्याकडे वेगवेगळ्या २५ मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, हे बॉम्ब नाहीत का? असा सवाल सत्ताधारी नेत्यांना त्यांनी केला. शिंदे गटातील आमदार अलिबाबा चाळीस चोर असल्याची टीका राऊत यांनी केली. भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिरावे लागत असल्याने तो आता त्यांना जड होऊ लागला आहे.
सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राजकीय क्रांती सुरू आहे. आधी सीमाभाग केंद्र शासित करा, अशी मागणी राऊत यांनी केली. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत वैफल्यग्रस्त झाल्याची टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत वैफल्यग्रस्त नाहीत, तर ते दुसऱ्याला नैराश्यग्रस्त करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचलंत का ?