नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : पाकव्याप्त कश्मीर भारतात येणार हे एप्रिल फुल आहे. नागपूरचे वकील सतीश उके यांच्यावर कारवाई झाली. त्यांनी कोणाला धमकी दिली असेल किंवा जमीन बळकावली असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल पण त्यांच्यावर कारवाई भारतीय दंड संहितेनूसार व्हावी. त्यासाठी महाराष्ट्राचे पोलिस तपास करतील पण राज्याच्या पोलिसांऐवजी ईडी आणि सीबीआयला बोलावून कारवाई केली जात आहे. यामुळे राज्यातील पोलिसांना कमकुवत करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे, असा घाणाघाती आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सतीश उके यांनी मागच्या काही काळापासून भाजपच्या नेत्यांवर लक्ष्य केल्याने त्यांच्यावर सुडाचे राजकारण करून त्यांना अडकवण्याचे काम सुरू आहे. विरोधकांकडून राज्याची कायदा व सुव्यवस्था यामुळे बिघडवण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या कारवाया करत आहे त्यावरून त्यांनी पाकिटमारांच्यावर छापा टाकण्याचे बाकी राहिल्याचीही मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया होतात त्याप्रमाणे केंद्राचे अधिकारी आमच्यावर अतिरेक्याप्रमाणे अटक करून जातात. ते कुठेही कारण नसताना घुसून कारवाई करतात. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांवरील विश्वास उडत चालला आहे. ईडी आणि सीबीआयकडून होणाऱ्या कारवायांमुळे राज्यातील गृहखाते कमकुवत करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, हिंदुचे नवीन वर्ष सुरू होत आहे. देशातील प्रत्येक नागरीक सुखा समाधानाने जगला पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे.