इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा दुष्काळ जाहीर करताना शासनाने लावलेल्या निकषांमुळे सांगली जिल्हयातील जत, कवठे महाकाळ, वाळवा , तासगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश झालेला नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्यात प्रचंड असंतोष आहे. शासनाने तात्काळ निकष बदलून संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दै. 'पुढारी' शी बोलताना केली.
आ. जयंत पाटील म्हणाले, सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील फक्त मिरज, शिराळा, खानापूर , कडेगाव याच तालुक्यांचा समावेश केला आहे. यातून जत, कवठे महंकाळ, तासगाव, आटपाडी हे दुष्काळी तालुके वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तवीक यावर्षी संपुर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटूंबांची अवस्था तर बिकटच आहे. अशा परस्थितीत शासनाने सर्वच शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.
ते म्हणाले, जत तालुक्यातील ६५ गावांना अद्याप पाणीच मिळाले नाही. यावर्षी तर पाऊसच कमी असल्याने परस्थिती गंभीर आहे. जतसह आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस , वाळवा या तालुक्यातही सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यात समावेश होणे गरजेचे आहे. दुष्काळ जाहीर करताना शासनाने जे निकष लावले आहेत, त्यामुळे कदाचीत हे तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट झाले नसतील. त्यामुळे शासनाने तातडीने निकष बदलून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा शेतकऱ्यांच्यात उद्रेक होईल.
हेही वाचा :