मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कायम राहणार असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये शुक्रवारी २८ जुलैला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाल्याने तसेच तिची हालचाल वायव्य दिशेला होण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत गुरुवारी मुसळधार कायम राहिली. उद्याही तशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.