![भाजप देशभरात भीती, हिंसा, द्वेष पसरवत आहे : राहुल गांधींचा हल्लाबोल](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, परंतु मोठ्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जमाफी कशी होत आहे, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया येत आहे. काही हजारांच्या कर्जासाठी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. देशभरात भाजप भीती, हिंसा, द्वेष पसरवत आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आज (दि.१८) बुलढाण्यातील शेगाव येथे चढवला. भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी काँग्रेस नेते उपस्थित होते.
बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही. तरुणांची स्वप्ने धुळीस मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत. विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विम्याचे पैसे भरूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही.
भाजपकडून देश तोडण्याची काम सुरू आहे, पण आम्ही जोडण्याचे काम करत आहे. भारत जोडो यात्रेचं ध्येय 'मन की बात'साठी नाही, तर तुमचं म्हणणं समजण्यासाठी आहे. भाजपने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे, अशी टीका गांधी यांनी केली.
ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, शाहू महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांची आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. येथील लोकांकडून मला भरपूर प्रेम मिळाले. भरपूर शिकायला मिळाले, अशी भावना राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचलंत का ?