नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणुकीमध्ये एनडीएच्या मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित एनडीएच्या बैठकीतून व्यक्त केला. २०१४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावर होती, आज ती पाचव्या क्रमांकावर आहे. एनडीएच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचणारच, असा दावा पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) यावेळी केला.
पुढे बोलतांना पंतप्रधान म्हणाले, १९८८ मध्ये एनडीए स्थापन करण्यात आला. पंरतु, कुणा विरोधात नाही. कुणाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी नाही. तर, देशात स्थिरता आणण्यासाठी एनडीए स्थापन करण्यात आली होती. एनडीएच्या उभारणीत अटल वाजपेयी यांचे योगदान महत्वाचे आहे. लालकृष्ण आडवाणी, प्रकाश सिंह बादल, बाळासाहेब ठाकरे, शरद यादव, अजित सिंह, रामविलास पासवान यांची देखील महत्वाची भूमिका राहीली आहे. आज, प्रकाश सिंह बादल आणि बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी आपल्या सोबत बसले आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
विरोधात असताना एनडीएने नेहमी सकारात्मक राजकारण केले. जनादेशाचा अपमान एनडीएने कधीच केला नाही. सरकार विरोधात काम करण्यासाठी कधीही परराष्ट्राकडून मदत मागितली नाही. विरोधात असतांना कधीही देशाच्या विकासात अडथळे आणले नाही, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशात राजकीय आघाडीची एक दीर्घ परंपरा राहीली आहे. पंरतु, ज्या आघाडी नकारात्मकतेवर अवलंबून होत्या त्या कधीच यशस्वी झाल्या नाहीत. कॉंग्रेसने ९० च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी आघाडीचा वापर केला. कॉंग्रेसने सरकार बनवले आणि सरकारे अस्थिर केले. पंरतु, एनडीएचे लक्ष विकसित भारताचे आहे. आत्मनिर्भर भारताचे आहे.
आघाडी जेव्हा सत्तेच्या मजबुरीने, भ्रष्टाचाराच्या उद्देशाने, परिवारवादाच्या धोरणावर आधारीत असते, जातिवाद आणि प्रादेशिकवाद समोर ठेवून केले जाते तेव्हा ती देशासाठी अत्यंत नुकसान करणारी ठरते. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या.पंरतु, सरकार एनडीएचीच बनवण्यात आली, असे मोदी म्हणाले.
लोक आज मोदींना शिव्याशाप देण्यात वेळ घालवत आहेत. देशासाठी त्यांनी विचार केला असता, गरीबांबद्दल विचार करण्यात त्यांनी वेळ घालवला असता ते चांगले झाले असते. अशांसाठी आपण केवळ प्रार्थना करू शकतो. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक जवळजवळ तर येवू शकतात. पंरतु, एकमेकांजवळ येवू शकत नाही. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांची देखील चिंता नाही. आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्यांचा अचानक सत्कार करावा, अशी अपेक्षा ते आपल्या कार्यकर्त्यांकडे ठेवतात, अशा शब्दात मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.
आम्ही देशसेवेसाठी सर्वांचे योगदान स्वीकारले आहे. त्यांचे कौतुक केले आणि त्यांना सन्मानित केले आहे. लोकशाहीची ही मुळ भावना एनडीएच्या कार्यशैलीत प्रत्येक ठिकाणी दिसेल.एनडीए सरकाने गेल्या ९ वर्षात भ्रष्टाचाराचे प्रत्येक मार्ग बंद करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले आहे. पूर्वी सत्तेच्या केंद्रात जे 'मध्यस्थ' फिरत होते त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जनधन, आधार मोबाईलची त्रिशक्तीतून गरीबांचे हक्क हिरावून घेण्यापासून रोखले आहे. २०१४ पूर्वीच्या आघाडी सरकारचे उदाहरण आपल्या समोर आले. पंतप्रधानांच्या वर एक 'श्रेष्ठी', धोरणात्मक लकवा, निर्णय घेण्यात अक्षमता, अव्यवस्था तसेच अविश्वास, ओढताण आणि भ्रष्टाचार , लाखो कोट्यवधींचे घोटाळे बघायला मिळाले, अशा शब्दात पंतप्रधानांनी यापूर्वीच्या सरकारवर टीकास्त्र डागले.
अशोक हॉटेलमध्ये बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्वाचे स्थान देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच शिंदे बसले. तर, अमित शहा यांच्या बाजूला अजित पवार बसले होते.