![PM Modi in Loksabha : आगामी निवडणुकीनंतर विरोधक प्रेक्षक गॅलरीत बसतील, पीएम मोदींचा खोचक टोला](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2FPM-Modi.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर आभार व्यक्त केले. या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ पहायला मिळाला. पीएम मोदींनी कांग्रेसच्या घराणेशाहीविरोधात हल्लाबोल केला. काँग्रेसमध्ये एकमेकांवर विश्वास नाही. काँग्रेसमुळेच देशाचं नुकसान झालं असून, घराणेशाहीला आमचा विरोध आहे. येणाऱ्या निवडणूकी नंतर विरोधक प्रेक्षक गॅलरीत बसतील, असा खोचक टोला पीएम मोदींनी लगावला.
पीएम मोदी म्हणाले की, एकाच प्रॉडक्टमुळे काँग्रेसचं दुकान बंद होत आहे. देशाला पुढे नेण्यासाठी चांगल्या पक्षाची गरज आहे. घराणेशाहीमुळे खर्गे लोकसभेतून राज्यसभेत गेले. हा परिणाम घराणेशाहीचा आहे. पक्षाचे निर्णय एकच कुटूंब घेतो, ही घराणेशाही आहे. किती दिवस समाजाचे शोषण केले जाणार? कधीपर्यंत देशाचे तुकडे होणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. एकाच कुटूंबाने पक्ष चालवणं हे आम्हाला अमान्य आहे. ही घराणेशाही आम्ही मोडून काढणार आहे. एका कुटूंबाच्या पुढे काँग्रेस विचार करु शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आहे. ही मोदींची गॅरंटी असल्याचे पीएम मोदी म्हणाले. जनतेचा आमच्यावर आशिर्वाद आहे, त्यामुळे यशस्वीरित्या तिस-यांदा एनडीएचे सरकार येणार आहे. विरोधक हे विरोधकच राहणार आहेत. निवडणूक झाली तर विरोधक प्रेक्षक गॅलरीत बसतील. अशी खोचक टीका पीएम मोदींनी केली.
विरोधकांनी स्वप्न बघण्याचं सामर्थ्य गमावलं आहे. ते म्हणतात आम्ही सत्तेत आलो की, विकास अपोआप होईल. सरकार स्थिर असावं लागतं. विरोधकांमध्ये लढण्याची हिंमत नाही. पण मी सांगू इच्छितो की, काँग्रेसमुळे देशाचं नुकसान झाले आहे. जर ते सत्तेत असते तर देशाचा विकास होण्यासाठी अजून १०० वर्षे वाट पहावी लागली असती. अलायन्सची अलान्मेंट बिघडलेली आहे, असा टोलाही पीएम मोदींनी लगावला.
भारतीय आळशी हे नेहरूंचे शब्द आहेत. भारतीयांमध्ये मेहनत करण्याची सवय नाही असंही नेहरू म्हणाले होते. काँग्रेसने नेहमी जनतेला कमी समजलं आहे. ते नेहमी स्वत: ला सरकार समजत गेलं. आजच्या परिस्थितीला पूर्णपणे काँग्रेस जबाबदार आहे.
गरीबांसाठी ४ कोटी घरे देण्याचे कार्य आमच्या सरकारने केले आहे. आयुष्मान भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ, नारी शक्ती अशा अनेक योजना आमच्या सरकारने आणलेल्या आहेत.