मुंबई: पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज या गावात जमिनीच्या वादातून आदिवासी पारधी समाजाच्या महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाज माध्यमावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Prakash Ambedkar)
आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आणखी एक अत्यंत चिंताजनक आणि मनाला हेलावून टाकणारा महिला जातीय अत्याचार महाराष्ट्रात घडलाय. घटना इतकी घृणास्पद आणि तितकीच संतापजनक आहे की, मला शब्दांत राग आणि दुःख दोन्ही व्यक्त होणे केवळ अशक्य आहे. बीडमधील भाजपचा विधान परिषदेतील आमदार सुरेश धस याची पत्नी आणि त्यांनी पोसलेल्या गुंडाद्वारे हा जातीय अत्याचार घडला आहे. (Prakash Ambedkar)
एक साधारण चाळीस वर्षाच्या पारधी समाजाच्या महिलेला अमानुष मारहाण करत, तिची विवस्त्र धिंड काढली. त्या महिलेचा गुन्हा होता की, त्या कष्टाने जमीन कसून राहत होत्या. ती जमीन आमदार सुरेश धसला बाळकावता आली नाही. तिने त्याचा केवळ विरोध केला हा तिचा गुन्हा असू शकतो का? दुर्दैव हे की, हे सगळे लाजिरवाणे आणि घृणास्पद कृत्य सुरेश धस याच्या पत्नी समोर आणि त्यांच्या सहमतीने झाले आहे.
या सर्वात अत्यंत वेदनादायी काही असेल तर ते म्हणजे जेव्हा ती महिला आणि त्यांची मुलगी तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. शेवटी त्या महिलेने ऑनलाईन तक्रार दाखल केली. आम्ही शोषितांच्या प्रश्नसाठी कायम लढतो. त्यामुळें वंचित बहुजन आघाडीचे नेते, राज्य उपाध्यक्ष किसन चव्हान यांनी आज ताबडतोब पीडितांना भेटून आमपले समर्थन देत त्यासाठी लढण्याची हिंमत दिली आहे. आज वंचितचे 250 हून अधिक कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल आहेत. जे सुरेश धस विरोधत गुन्हा दाखल करण्या संदर्भात मागणी करत आहोत. असेही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. या प्रकरणात भाजपा विधान परिषद आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर अट्रोसिटी गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा