पुढारी ऑनलाइन डेस्क : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच अपघातग्रस्तांना शक्य ती मदत पुरवली जात आहे, असे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दुःख व्यक्त करत अपघातग्रस्तांना सांत्वन देण्याचा प्रयत्न केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. "ओडिशातील रेल्वे अपघातामुळे व्यथित आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल परिवारासोबत आहेत. जखमी लवकर बरे होवोत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे."
या रेल्वे दुर्घटनाबाबत विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना श्रद्धांजली दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ओडिशामधील बालेश्वरजवळ शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेचे वृत्त क्लेशदायक आहे. या अपघातात बळी पडलेल्या दुर्दैवी प्रवाशांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली. हा आघात सहन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या आप्तस्वकीयांस बळ द्यावे व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना."
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले, "ओडिशातील भीषण रेल्वे दुर्घटनेबद्दल कळून वाईट वाटले.
ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना."