हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील जामठी खूर्द येथे शेतीचे वादावरून झालेल्या दुहेरी खून प्रकरणामध्ये (जामठी खुर्द येथील दुहेरी खून ) नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांनी आज (दि.२९) ही शिक्षा सुनावली.
यासंदर्भात सरकारी वकील अँड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथील अंबादास आबाजी भवर व त्यांचा भाऊ रामप्रसाद आबाजी भवर यांच्यामध्ये त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतीचा वाद होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये किरकोळ हाणामारीच्या घटना देखील होत होत्या.
२२ जानेवारी २०१६ रोजी सकाळी अंबादास भवर, उद्धव भवर, संजय भवर हे शेतात काम करत होते. यावेळी पुन्हा एकदा वाद उफाळून आला. यावेळी दहा जणांनी अंबादास भवर, उद्धव भवर व संजय भवर यांना तलवारी, काठीने कुऱ्हाडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये अंबादास भवर व उद्धव भवर यांचा मृत्यू झाला. तर संजय भवर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी(जामठी खुर्द येथील दुहेरी खून ) आयोध्याबाई उद्धव भवर (रा. जामठी खूर्द) यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांच्या पथकाने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
जिल्हा व सत्र न्यायालयचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली . या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दुहेरी खून प्रकरणात प्रल्हाद आबाजी भवर, रामप्रसाद आबाजी भवर, आत्माराम प्रल्हाद भवर, बालाजी रामप्रसाद भवर, माधव प्रल्हाद भवर, नंदाबाई आत्माराम भवर, नामदेव दाजीबा घ्यार, विठ्ठल दाजीबा घ्यार, पार्वतीबाई माधव भवर या नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर सुजानबाई भवर यांची निर्दोष मुक्तता केली. प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अँड. एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले.
हेही वाचलंत का?