![अमली पदार्थ](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F10%2Fdrugs-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अंमली पदार्थांच्या विक्री व सेवनाबाबत कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वेगवेगळे पर्याय अवलंबिले जात आहेत. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत नशेखोरीचा विमोड केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत दिली.
वाढत्या व्यसनाधीनतेबाबत आमदार सुनील प्रभु यांनी लक्षवेधीतून हा विषय मांडला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकार अंमली पदार्थांसंदर्भात गंभीर आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी अंमली पदार्थ विरोधी टास्कफोर्स स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजच कारवाई केल्यास हे संकट थोपविले जाऊ शकते. नियमित बैठका घेऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. कफ सीरप सारख्या उघडपणे विक्रीला पायबंद प्रकारात प्रत्येक फार्मसीला सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय कोणालाही कफ सिरप देता येणार नाही. ऐवढेच नाही तर आलेला साठा व विक्रीच्याही नोंदी ठेवाव्या लागतील.
कंटेनरमध्ये खाली अंमलीपदार्थ व वर वेगळा माल भरून आणले जात असल्याचे प्रकारही समोर आले आहेत, असे प्रकार पुढे घडू नयेत, यासाठी स्कॅनर लावले जातील. सध्या कुरियरद्वारेही अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असेही फडणवीस या वेळी बोलताना म्हणाले.