नवी दिल्ली; प्रशांत वाघाये : राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप जवळजवळ अंतिम झाले असताना भाजप आणि महायुती जागावाटप देखील अंतिम झाले आहे. सूत्रांनुसार महाराष्ट्रातील ४८ पैकी ३२ जागा भाजप लढणार आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १० जागा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र जागावाटप करताना ज्यांची जिथे ताकद त्यांचे तिथे उमेदवार हेच निकष लावण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपची महत्वपुर्ण बैठक दिल्लीत पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा होणार आहे. या पार्श्वभुमीवर भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्याचे समजते. दरम्यान, भाजप ३० ते ३५ जागा आगामी लोकसभेत लढवू शकते. असे वृत्त ३ डिसेंबरला 'पुढारी'ने प्रकाशित केले होते.
महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अन्य काही पक्ष आहेत. या सर्व पक्षांमध्ये प्रामुख्याने तीनच पक्ष लोकसभेला आपले उमेदवार लढवतील, असेही समजते. ४८ पैकी सोबत असलेल्या मित्र पक्षांना काही जागा प्रमुख पक्षांच्या कोट्यातून दिल्या जाऊ शकतात.
दरम्यान, गेले काही दिवस महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत सुरू असलेला तिढा महायुतीसह महाविकास आघाडीमध्येही सुरु आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेरा खासदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दहा जागा दिल्यास अन्य तीन खासदारांचे काय हा प्रश्न देखील महायुतीसमोर असणार आहेत. त्यासोबतच अजित पवार गटाला केवळ सहा जागा दिल्या जातील तर अजित पवार गट नाराज होण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाला ज्या सहा जागा दिल्या जाऊ शकतात त्यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, भंडारा- गोंदिया, रायगड आणि मावळ लोकसभा असण्याची शक्यता आहे. यामध्ये केवळ रायगडमध्ये अजित पवार गटाचे खासदार आहेत. बारामती, सातारा आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार आहेत. भंडारा- गोंदियामध्ये भाजप आणि मावळमध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत. सध्या लोकसभेत निवडून गेलेले सुनिल तटकरे हे एकमेव खासदार अजित पवार गटासोबत आहेत.
हेही वाचा