पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात थंडीने कहर केला असून त्या भागातील किमान तापमान 1.5 ते 4 अंशावर खाली आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र देखील गारठण्यास सुरुवात झाली आहे. 26 जानेवारी पर्यंत राज्यात थंडी राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवाल आहे.मंगळवारी जळगाव (9.6),नाशिक (10.6) तर पुणे शहराचे तापमान 11.4 अंशावर खाली आले होते.
उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाला असून 25 पासून दुसरा चक्रवात सक्रीय होत आहे.त्यामुळे संपूर्ण उत्तर भारत गारठला असून तेथे 1.4 ते 4 अंशा पर्यंत तापमान खाली आले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, उप-हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम हा भाग गारठला आहे.
मंगळवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे 1.5 अंश तापमानाची नोंद झाली.25 ते 28 जानेवारी पर्यंत हिमालयात हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने तो पट्टा मराठवाड्यावरही आहे.त्यामुळे बुधवारी मराठवाडा व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जळगाव 9.6, नाशिक 10.1,पुणे 11.4, अहमदनगर 11.7, महाबळेश्वर 11.5, मालेगाव 11.6,सांगली 13.9, सातारा 12, छत्रपती संभाजीनगर 12.3, कोल्हापूर 15.1, मुंबई 19.6, परभणी 17.2, नांदेड 18.6, अकोला 17.4, अमरावती 18.7, चंद्रपूर 17.6.