पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला आज (दि.६) भीषण आग लागली. या दुर्घटनेत ५ ठार झाले आहेत. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. MP Harda Blast
मध्य प्रदेशातील हरदा येथील मगरडा रोडवरील बैरागढ रेहता नावाच्या ठिकाणी असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात आज सकाळी भीषण आग लागली. यानंतर भयानक स्फोट होऊ लागले. हे स्फोट इतके जोरदार होते की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीही हादरल्या. काही इमारती कोसळल्याचे सांगितले जात आहे. या आगीने आजूबाजूच्या घरांनाही आपल्या कवेत घेतले. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूची घरे कोसळली. यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सुमारे १०० जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. हरदा स्फोटाबाबत मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी तातडीची बैठक बोलावली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना हरदा येथे रवाना होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. MP Harda Blast
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा कारखान्यात ३० हून अधिक कामगार काम करत होते. जखमी आणि मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा फटाका कारखाना राजू अग्रवाल यांचा आहे.
हरदा घटनेची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मंत्री उदय प्रताप सिंह, एसीएस अजित केसरी, डीजी होमगार्ड अरविंद कुमार यांना हेलिकॉप्टरने हरदा येथे जाण्याचे निर्देश दिले आहेत. भोपाळ आणि इंदूरच्या वैद्यकीय महाविद्यालयांना तसेच एम्स भोपाळ येथील बर्न युनिटला आवश्यक तयारी करण्यास सांगितले आहे. तसेच इंदूर आणि भोपाळ येथून अग्निशमन दल पाठवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदतकार्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्फोट इतके भीषण होते की, शेजारी असलेल्या गोठ्याचेही मोठे नुकसान झाले. तेथील एका कर्मचाऱ्याने खिडक्यांच्या काचा फुटल्याचे सांगितले. तर लेखापाल जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्यानंतर जोरात स्फोट झाले. सुमारे १० ते १५ मोठे स्फोट झाले. अनेक किलोमीटर अंतरापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्फोटामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा