![संग्रहित फोटो](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2F%E0%A5%A8%E0%A5%AA.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयातील बँकेतून शालेय शिक्षण विभागाच्या लाखो रुपयांवर डल्ला मारण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षरीचा वापर करून चार टप्प्यात तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली.
संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा म्हणजेच मंत्रालयाच्या बँकेतून मोठी रक्कम चोरी झाल्याने प्रशासकीय विभाग चांगलाच हादरला आहे. आरोपींनी ही लूट करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीचा वापर केला आणि चार टप्प्यात 47 लाख 60 हजार काढले.
राज्य सरकारच्याच तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात चौघांवर कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर वळते झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे चौघे कोण आहेत? यामागे नेमका कुणाचा हात आहे? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे तब्बल 67 लाख पळवले गेले होते. त्याचाही तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत.