राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राधानगरी, काळम्माडी आणी तुळशी धरणक्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरण पूर्णक्षमतेने दोन दिवसात भरेल असा अंदाज आहे तर काळम्मावाडी आणी तुळशी ही दोन धरणे कशीबशी पन्नास टक्के भरली आहेत. यामधील राधानगरी धरणातुनच फक्त प्रतिसेकंद १४०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
तालुक्यात राधानगरी, काळम्मावाडी आणी तुळशी ही तीन प्रमुख धरणे आहेत. यामधील राधानगरी धरण ८८ टक्के काळम्मावाडी धरण ४७.३२ टक्के आणी तुळशी धरण ४५.८४ टक्के भरले आहे. जुनअखेर या धरणातील पाणीसाठ्याने तळच गाठला होता. त्यातच पावसाने दडी मारल्याने पाणीबाणीची शक्यता निर्माण झाली असतानाच पावसाने हजेरी लावली आणी उशीरा लावलेल्या हजेरीचा वजावटा काढला.जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणामध्ये ८८टक्के पाणीसाठा झाला आहे.धरणक्षेत्रामध्ये २०६२ मि.मी.पावसाची नोंद झाली असली तरी गतवर्षीपेक्षा ही नोंद २०८७ मि.मी. इतकी होती.या धरणातुन चौदाशे क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये सोडले जात आहे.
काळम्मावाडी धरण ४७.३२ टक्के भरले असुन या धरणातुन पाणी सोडलेले नाही. या धरणक्षेत्रामध्ये आज अखेर १२७७ मि.मी.पावसाची नोंद झाली असुन गतवर्षी ही नोंद १४७८ मि.मी.होती. तशीच स्थिती तुळशी धरणाची असुन या धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु केलेला नाही, तुळशी धरण ४५.८४ टक्के भरले आहे. या धरणक्षेत्रामध्ये चालुवर्षी १५१२ मि.मी.पाऊस झाला असुन गतवर्षी ही नोंद १९०६ मि.मी.होती.