![Soumya Vishwanathan : पत्रकार सौम्या विश्वनाथन यांना १५ वर्षांनंतर न्याय, मारेकऱ्यांना शिक्षा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FSoumya-Vishwanathan.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या 2008 मध्ये झालेल्या हत्येतील पाचही आरोपींना आज (दि. १८) न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दिल्लीत घडलेल्या गुन्ह्याच्या जवळपास पंधरा वर्षांनंतर बुधवारी दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
हेडलाईन्स टुडे या वृत्तवाहिनीचे पत्रकार असलेले विश्वनाथन यांची सप्टेंबर २००८ मध्ये ऑफिसमधून घरी जात असताना त्यांच्या कारमध्ये गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आज दिल्ली न्यायालयाने रवी कपूर, अमित शुक्ला, अजय कुमार, बलजीत मलिक आणि अजय सेठी या पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार पांडे यांनी १३ ऑक्टोबर रोजी हा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज या प्रकरणाचा निकाल देऊन पत्रकार सौम्या यांना न्याय दिला आहे.
पत्रकार सौम्या विश्वनाथन यांचा 30 सप्टेंबर 2008 रोजी दक्षिण दिल्लीच्या वसंत कुंज भागात त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळून आला होता. कारमधील संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम होते. फॉरेन्सिक अहवाला आधी हा एक अपघात असल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ही हत्या असल्याचा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला. त्यानंतर काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले होते.