पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत वि. दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज (दि.१७) जोहान्सबर्गच्या मैदानावर झाला. पहिला सामन्यात भारताने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने अवघ्या १७ षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने दिलेले ११६ धावांचे माफक आव्हान पूर्ण केले. अर्शदीप सिंग आणि आवेश खानचा भेदक मारा आणि साई सुदर्शन, श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला.
भारताकडून, साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यरने अर्धशतके झळकावली. साई सुदर्शनने ४३ चेंडूमध्ये ५५ धावांचे तर श्रेयस अय्यरने ४५ चेंडूमध्ये ५२ धावांचे योगदान दिले. साई सुदर्शनने पदार्पणातच अर्धशतक झळकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो १७ वा भारतीय ठरला आहे. आफ्रिकेकडून, विल्यम माल्डर आणि अँडिले फेकलुकवायो यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याच्या मानसिकतेने आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला. मात्र अर्शदीप सिंग आणि आवेश खानच्या भेदक माऱ्याने आफ्रिकेचा डाव केवळ ११६ धावांमध्ये गुंडाळला. वेगवान गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे आफ्रिकन फलंदाजांना अक्षरश: नांगी टाकली. (RSA vs IND 1st ODI)भारताकडून, अर्शदीप सिंगने ५, आवेश खानने ४ आणि कुलदीप यादवने १ विकेट पटकावली. अर्शदीपने सातत्याने आफ्रिकेला धक्के दिले. त्यामुळे आफ्रिकन फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. फेकलुकवायो शिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावांचा टप्पा पार करता आला नाही.
आफ्रिकेकडून टोनी डी झॉर्झी २२ चेंडूमध्ये २८ धावा, एडन मार्कराम २१ चेंडूमध्ये १२ धावा, हेनरी क्लासेन ९ चेंडूमध्ये ६ धावा आणि डेव्हिड मिलरने ७ चेंडूमध्ये २ धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने ५ आणि आवेश खानने ४ विकेट्स पटकावल्या. आफ्रिकेच्या ३ फलंदाजांना भोपळाही फोडता आलेला नाही. रीझा हेंड्रिक्स, रॅसी वँडर ड्युसेन आणि विआन मल्डर हे ३ फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाले. (RSA vs IND 1st ODI)
हेही वा