पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज ८६ धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर आज (दि.१४) भारताने क्रिकेट वन-डे विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तान विरुद्ध ७ गडी राखत विजय मिळवला. दरम्यान, टीम इंडियाने पाकवर विजय मिळवताच अहमदाबाद स्थित नरेंद्र मोदी स्टेडियम 'वंदे मातरम'च्या घोषणांनी दणाणले. भारताच्या विजयानंतर पीएम नरेंद्र मोदींनीही टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
भारताच्या दिमाखदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघाने घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला वन-डे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे. वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारताचा हा सलग आठवा विजय ठरला आहे. या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धचे 'अजिंक्य'पद टीम इंडियाने अबाधित ठेवले आहे. ३४ षटकांच्या आत भारताने लक्ष्य साध्य केल्यामुळे रनरेनटमध्ये भारताची सरशी ठरली आहे. यामुळे टीम इंडियाने गुणतालिकेत पहिल्या क्रमवारीवर झेप घेतली आहे.