कल्याण लोकसभेची चिंता आता मला नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेवाळी (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने कल्याण लोकसभेबद्दल चर्चेला उधाण आले होते. या मतदारसंघावर भाजपा दावा ठोकणार अस बोललं जातं होत. सोमवारी कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना मला कल्याण लोकसभेची चिंता नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता कल्याण लोकसभेबद्दल मुख्यमंत्र्यांनी पूर्ण विराम देऊन उमेदवार हे खासदार शिंदेच असल्याचे ठणकावून सांगितले आहे.
कल्याण लोकसभेबद्दल गेल्या काही महिन्यांपासून चर्चेला उधाण आले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपा नेत्यांच्या दौऱ्यांमुळे चर्चेला आला होता. मात्र या मतदारसंघाचा उमेदवार मीच असेल असं खासदार शिंदे यांनी ठणकावून सांगितले होते. आता मुख्यमंत्र्यांनी कल्याण मध्ये कल्याण लोकसभेची चिंता नसल्याचे सांगत उमेदवार श्रीकांत शिंदेच असल्याची अनौपचारिक घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा करताच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कल्याण लोकसभेला मतदारसंघाला निधी देण्यामागे उद्देश एकच होता नागरिकांना चांगले रस्ते विरंगुळ्याची साधने इतर सोयी सुविधा मिळाली पाहिजे. कल्याण लोकसभेत अनेक प्रकल्प आता सुरू आहेत आणि भविष्यातही होतील. श्रीकांत शिंदे यांचे मी अभिनंदन करतो कारण चांगला खासदार तुम्हाला लाभलेला आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. कल्याण पूर्वेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या वतीने आयोजित कल्याण महोत्सवासाठी मुख्यमंत्री कल्याण पूर्वेत आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं सांगितलं आहे. यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड यांसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात मुख्यमंत्री बनून काम करा
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करत असताना सर्वसामान्य शिवसैनिकाप्रमाने काम करत आहेत. राज्यात ठिकठिकाणी फिरून ते आपले कर्तव्य पार पडताना दिसून येत आहेत.अनेक संकटांच्या कालखंडात मुख्यमंत्र्यांनी केलेली काम ही अनेकांच्या निदर्शनास आलेली आहेत. त्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरायचं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी आता ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री बनून काम करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभेत नागरिकांना केलं आहे.