![सदाभाऊ खोत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2FUntitled-design-2024-03-27T140459.226.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा सन २०१९ च्या निवडणुकीपासून आम्ही हातकणंगले मतदार संघ रयत क्रांती संघटनेला मागत आहोत. मात्र राजकारणात प्रस्थापितांनाच प्राधान्य दिले जात असल्याने आमच्यासारखे विस्थापित दुर्लक्षीतच राहात आहेत, अशी खंत रयतक्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. हातकणंगलेच्या जागेसंदर्भात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत म्हणाले, सुरवातीपासूनच प्रस्तापितांच्या विरोधात आमची लढाई सुरु आहे. आम्ही नेहमी विस्तापितांच्या बाजूनेच राहिलो आहे. मात्र राजकारणात प्रस्तापित घराणीच आमच्या मानगूटीवर बसत आहेत. त्यामुळे भविष्यात विस्तापित विरुद्ध प्रस्तापित लढाई अधिक तीव्र करणार आहोत. आम्ही महायुतीकडे हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेला मिळावी अशी मागणी केली होती. मात्र दुर्देवाने या मागणीचा विचार होताना दिसत नाही.
ते म्हणाले, सन २०१९ च्या निवडणुकीतही आम्ही निवडणूक लढविण्याची सर्व तयारी केली होती. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेला गेली. आम्हाला थांबण्याचा सल्ला देण्यात आला. युतीचा धर्म पाळून आम्ही माघार घेतली. प्रचारप्रमुखाची भुमिका बजावून महायुतीचा उमेदवार निवडून आणला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. आम्ही पुन्हा रस्त्यावरची लढाई लढत सामान्य जनतेशी नाळ कायम ठेवली. आता या निवडणुकीत तरी हातकणंगलेची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आम्ही महायुतीकडे केली होती. मात्र पुन्हा आम्हाला डावलण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही आता प्रस्तापितांचा प्रचार करणार करणार नाही. कार्यकर्त्यांची बैठक घेवून पुढील भुमिका निश्चीत करु. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून या जागेसंदर्भात चर्चा करू असे ते म्हणाले.
हेही वाचा :