नागपूर : पुढारी वृत्तसेवा आपला देश सर्व क्षेत्रात पुढे चालला आहे. आपली अर्थव्यवस्थाही वेगाने पुढे जात आहे. टेक्नॉलॉजी, कृषी तसेच अनेक क्षेत्रातही मोठी प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश अव्वल स्थानी पोहोचला आहे. जी२० मध्ये भारताने केलेल्या आदरातीथ्याचं जगभर कौतुक होत आहे अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महानगरचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव आज (मंगळवार) सकाळी रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. भारताने आयोजित केलेली जी 20 शिखर परिषद विशेष होती. भारतीयांच्या आदरातिथ्याचं जगभर कौतुक झालं. विविध देशांतील लोकांनी आमची विविधता अनुभवली. त्यांनी आमचे राजनैतिक कौशल्य तसेच आमची प्रामाणिक सदिच्छा पाहिल्याचे ते म्हणाले.
संघ परिवारात विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे विशेष महत्त्व असते. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विजयादशमीच्या दिवशीच रेशीमबाग मैदानावर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ६.२० वाजता पथसंचलन झाले. त्यानंतर सकाळी ७.४० वाजता विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा पार पडला.
यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सर्वसाधारणत: सरसंघचालकांच्या भाषणातून संघाच्या भविष्यातील योजना व भूमिकांचे संकेत मिळत असतात. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला विशेष महत्त्व आले आहे. विशेष म्हणजे, आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुका व संघस्थापनेच्या शतकोत्तर वर्षाची तयारी या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व आले आहे. यावेळी सरसंघचालक कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात याकडे स्वयंसेवक व सामाजिक वर्तुळासह राजकीय पक्षांचे देखील लक्ष लागलेले असते.