बारसुप्रकरणी राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीचे आदेश लागू

राजू शेट्टी
राजू शेट्टी

रत्नागिरी/ जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा बारसू (जि. रत्नागिरी) येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर रत्नागिरी जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही बंदी घालण्यात आलेली आहे. रत्नागिरी पोलिसांनी सोमवारी (ता.१) रात्री उशिरा हि कारवाई केली.

बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश करण्यात आला आहे. रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसांकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदीबरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडिया मध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

बारसू प्रकल्पास शेतक-यांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही शासनाकडून त्या ठिकाणी जबरदस्तीने जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतक-यांच्यावर लाठीहल्ले, अश्रूधूरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतक-यांच्या बाजूने उडी घेतली असून, त्यांचे प्रतिनिधींनी त्या ठिकाणी उपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे.

दरम्यान रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३१ मे अखेर शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली असून, यामध्ये त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे. अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे स्‍पष्‍ट करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री उशिरा रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्यावतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होवून त्यांना समक्ष ही नोटीस लागू केली आहे. शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याची कारणे दाखवित सदर नोटीस लागू करण्यात आलेली आहे.

अशा नोटीशींना मी भीक घालत नसून, ज्या ठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत असून, राज्य सरकार जनरल डायरप्रमाणे वागू लागले आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे अशी भूमीका राजू शेट्टी यांनी मांडली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news