बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शावर भैय्यासाहेब जगले. आपले पिताजी कायदामंत्री आहेत, राष्ट्रीय नेते आहेत म्हणून त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला नाही. ही शिकवणही बाबासाहेबांच्या कठोर स्वभावातून त्यांना मिळाली. दिल्लीच्या एका ठेकेदाराने यशवंतरावांना एका कामात पार्टनर म्हणून घेतले, 25 ते 30 टक्क्यांची लालूच दाखविली. ही बाब बाबासाहेबांना कळताच त्यांनी तडक यशवंतरावांना घरी जेवण न करू देता मुंबईला पाठविले. हा वस्तुपाठ त्यांना भावी आयुष्यात कामी आला. एके दिवशी मुुंबईत कोर्टाच्या कामासाठी ते गेल्यानंतर रांगेत उभे राहिले. त्यांच्या एका परिचिताने त्यांना ओळखले व पुढे येण्यास सांगितले, तोपर्यंत रांगेतील अन्य लोकांनाही बाबासाहेबांचे चिरंजिव आहेत, हे कळाले. पण यशवंतरावांनी जागा सोडण्यास नकार दिला व रांगेत उभे राहूनच आपले काम पूर्ण केले. सूर्यपुत्र भैय्यासाहेब असे त्यांना म्हटले जात असे.