![सुनील तटकरे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2F%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अलिबाग : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेले काम, नारी शक्तीसाठी घेतलेले निर्णय, पायाभूत सुविधा व इतर महत्त्वपूर्ण निर्णय लक्षात घेता सध्या विरोधकांकडील प्रचाराचे मुद्दे संपल्याने विरोधकांनी संविधान बचाव नावाने सुरू केलेली ओरड बिनबुडाची आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. अलिबाग येथे रविवारी आयोजित केलेल्या महायुती पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
संविधान बचावच्या नावाने वातावरण दूषित केले जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम आपल्याला घराघरात पोहोचवायचे आहे. भविष्यात नवीन मतदारांना मतदानासाठी आणावे लागेल आणि त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. ग्रामीण भागात आपली पकड घट्ट आहे. परंतु शहरात आपल्याला ताकदीने काम करावे लागणार आहे, असे तटकरे म्हणाले. या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, महेश मोहिते, आदींसह महायुतीचे शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.