Congress On PM Modi : नोटबंदीवरुन पंतप्रधानांवर काँग्रेसचे टीकास्त्र

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नोटबंदी करून देशातील जनतेला जो त्रास झाला, त्यासाठी देशातील जनता पंतप्रधान मोदींना कधीही माफ करणार नाही, अशी टीका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. एका विशिष्ट व्यक्तीला श्रीमंतांच्या यादीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी हे सगळे प्रयत्न होते, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महासचिव जयराम रमेश यांनीही नोटबंदीवरून पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली. (Congress On PM Modi)

श्रीमंत लोकांना नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले नाही. मात्र, सर्वसामान्य गरीब लोकांना रांगेत उभे केले गेले. जीएसटीने भारतातील छोटे व्यापारी संपवले. नोटबंदीमुळे २०११ नंतर जीडीपीची वाढ थांबली. नोटबंदी हा एम समजून रचलेला कट होता. देशातील नोकऱ्या घालवणे, कामगारांचे वेतन थांबवणे, लहान व्यापाऱ्यांना संपवणे हे काम नोटबंदीच्या माध्यमातून झाले. नोटबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. १ % लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी असंघटित क्षेत्रासह देशातील ९९% जनतेवर हा मोठा आघात होता. जनतेचे खिसे कापून आपल्या लोकांचे खिसे भरण्याचा प्रयत्न होता. एका विशिष्ट व्यक्तीला श्रीमंतांच्या यादीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी हे सगळे प्रयत्न होते, असा आरोप करत राहुल गांधींनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर टीका केली आहे. (Congress On PM Modi)

नोटबंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांवर नरेंद्र मोदींवर टीका केली. नोटबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी ५० दिवस मागितले होते, आज ७ वर्ष झाले. यामध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब अधिक गरीब होत आहेत. नोटबंदीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला. काळ्या पैशाला लगाम लावण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले. असेही ते म्हणाले.

काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री आठच्या सुमारास नोटबंदीची घोषणा केली होती. या घोषणेसह जुन्या अस्तित्वात असलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करत पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. आता मात्र दोन हजार रुपयांची नोट देखील चलनातून हटवली गेली. नोटबंदी हा एक असा निर्णय होता ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. याचप्रमाणे अचानक लावलेल्या लॉकडाउनमुळे लाखो लोकांना, कामगारांना हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत घरी जावे लागले. लोकांच्या दुःखात त्यांची खिल्ली उडवणे, यात पंतप्रधानांना आनंद मिळतो अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news