![CM-Deputy CM Press :](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2Fcm-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाइन डेस्क : CM-Deputy CM Press : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून (दि.16) सुरू होणार आहे. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी आतापर्यंतच्या अनेक कामांबाबतचे मुद्दे मांडले. विविध योजनांची माहिती दिली. तसेच कमकुवत असले विरोधी पक्षांना दुय्यम लेखणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. विरोधी पक्षांच्या प्रश्नावर सविस्तर उत्तर देऊ, लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच यावेळी शिंदे-फडणवीस यांनी विरोधकांना टोले देखील लगावले.
शिंदे म्हणाले, विरोधी पक्ष गोंधळलेला आहे. त्यांनी आत्मविश्वास गमावलेला दिसत आहे. राज्याच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर विधानसभेत वाचा फोडली पाहिजे, प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, विरोधी पक्षाचे काम आहेत, आम्ही तिघेही विरोधी पक्ष नेता होतो, त्यामुळे आम्हाला विरोधी पक्षनेत्याची कामे माहित आहे. आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले चांगल्याला चांगले म्हणा, तर जिथे जाब विचारायचा आहे तिथे जाब विचारा. मात्र, दुर्दैवाने विरोधी पक्ष काम करताना दिसत नाही. जनतेचे याकडे लक्ष असते. अजित पवार सरकारमध्ये आल्यापासून विरोधी पक्ष आहे कुठे हे शोधावे लागेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, काही ठिकाणी पाऊस झाला आहे, काही ठिकाणी झाला नाही. काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निश्चितच लक्ष देऊ, सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.
सरकार पडणार म्हणणाऱ्यांना शिंदे यांनी टोला देखील लगावला. सरकार पडेल असे म्हणू नका अन्यथा आणखी काही होईल, असा टोला त्यांनी लगावला.
मविआ सरकारच्या काळात थेट परदेशी गुंतवणुकीत एफडीआयमध्ये आपण मागे पडलो होतो. ते आता आपण पुन्हा नंबर एकवर आले आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांचा पाढा वाचला,
यामध्ये, 1 रुपयात पीक विमा योजना पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे 3301 कोटी रुपये सरकार भरणार, लेक लाडकी योजना, महिलांना एसटी मध्ये निम्म्या किंमतीत प्रवास, रोजगारात 75 हजार नोकऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, सरकारकडून अनेक प्रकल्पांना गती, तसेच यावेळी मुंबई महापालिकेची एफडी मोडल्याचे आरोप खोटे आहेत असे म्हटले. तसेच मुंबईला लवकरात लवकर खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे स्पष्ट केले.
महिलांवरील वाढत्या अत्याचारांसदर्भात तसेच मंत्र्यांकडून केलेल्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, कुठल्याही मंत्र्यांकडून महिलांबाबत अपशब्द उच्चारले जाणार नाही, महिलांसंदर्भातील चुकीच्या वक्तव्याचं समर्थन कुणीच करणार नाही, मंत्र्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :