![नागपूर : धान उत्पादकांशी शेतात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F12%2F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यामध्ये २६ ते २८ नोव्हेंबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरूवार (दि. ७) रोजी मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावाना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
संबंधित बातम्या
नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जवळपास १२४ गावाना फटका बसला आहे. ८५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. मौदा तालुक्यात रामटेक, पारशिवणी तालुक्यातही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात धानासोबतच कापूस, तूर, संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची चर्चा केली व त्यांचे सांत्वन केले. विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.