मुंबई; पुढारी वृत्तसेवा: उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या अकाली जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते. तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे, तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे एक उमदे व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
पालघरनजीक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?