![प्रमोद जठार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2F%E0%A4%9C%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : कोकणामध्ये अगदी पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत सहा लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी किमान दोन जागा महायुती म्हणून भाजपला सोडाव्यात, अशी आमची सरळ साधी मागणी आहे. विशेषकरून रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपला देवून महायुतीचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, असे विधान माजी आमदार व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे भाजपचे प्रमुख प्रमोद जठार यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत केले.
संबंधित बातम्या
कोकणातील ६ पैकी एकही जागा जर भाजपला दिली नाही तर महायुती पूर्ण होणार नाही. कार्यकर्त्यांनासुद्धा जोश येईल. अन्यथा भाजपचे कार्यकर्ते काम करताना दिरंगाई करतील असे स्पष्ट मत जठार यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर रत्नागिरी – सिंधुदुर्ग ही जागा भाजपच्या वाट्याला यावी, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर व किरण सामंत यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, असे जठार यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा भाजपचा तसेच नारायण राणेंचा बालेकिल्ला आहे. यामुळे ही जागा भाजपलाच द्यावी. जर जागा मिळाली नाही तर याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो, असेही जठार यांनी यावेळी सांगितले.