![Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा मुंब्र्यामार्गे ठाण्यात येणार; समारोप सभेला प्रियंका गांधींची हजेरी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F03%2FBharat-Jodo-Yatra.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ही अराजकीय यात्रा असून त्यात सर्व पक्षिय कार्यकर्ते, ज्यांना लोकशाही वाचवायचे आहे, ते नागरिक, समविचारी संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याने मीडियाला त्याची दखल घ्यावी लागत आहे, अशी ही खंत व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान नेहरू यांच्याप्रमाणे राहुल गांधी थेट लोकांमध्ये घुसून संवाद साधत असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या हुकूमशाही विरोधात एकमेव तरुण नेता तिरंगा हातात घेऊन लढत असल्याचे आव्हाड यांनी सांगून सर्व ठाणेकरांनी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच लोकसभा आचारसंहिता लागली तरी यात्रेला काही फरक पडणार नसून ही जनतेची यात्रा आहे. मुंबईतील सभेवरही आचारसंहितेचा परिणाम होणार नसल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात येत असल्याने आजपासून ठाण्यात पोस्टर लागले आहेत. त्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे. भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात येणार असे पोस्टर ठाण्यात लागले असून ते पोस्टर्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरील रस्त्यावर लावण्यात आले आहेत. त्याची चर्चाही रंगली आहे.