भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्यात ही यात्रा ठाण्यासह मुंबईत येत असल्याने या यात्रेचे नियोजन आणि कार्यक्रमांची आखणी करण्यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ठाणे काँग्रेस मुख्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून यात्रेबाबत माहिती दिली. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, शहर सचिव सचिन शिंदे, भालचंद्र महाडिक, संदीप शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यात्रेची माहिती देताना थोरात पुढे म्हणाले, ही यात्रा १२ मार्चला गुजरातमधून राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे ती १५ मार्चला वाडा, भिवंडी येथे येऊन भिवंडीत मुक्काम करणार आहेत. १६ मार्चला ही यात्रा ठाणे शहरात येईल. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सभा होणार आहे. त्यानंतर यात्रा मुलूंड येथे थांबेल आणि १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होईल. याच दिवशी ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.