बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : मुदतपूर्व निवडणूक, प्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार आणि पुनर्रचना, तसेच इतर काही विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई लवकरच दिल्ली दौरा करणार आहेत. ते परतल्यानंतर महत्त्वाच्या विषयांवर उत्तर मिळणार आहे. 14 एप्रिलपर्यंत बहुतेक विषयांवर निर्णय घेण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित आहे. इच्छुकांनी अनेकदा दिल्लीवारी केली. आपापल्या गॉडफादरद्वारे मंत्रिपदासाठी अनेक प्रयत्न केले. पण, दरवेळी त्यांची निराशा झाली. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि पुनर्रचनेवर शिक्कामोर्तब होणार होते. पण, पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी निकालानंतर सर्वकाही ठरवण्याचे सांगितले. तोपर्यंत पक्ष संघटनेची सूचना दिली. पण, इच्छुकांची नाराजी वाढत जाऊन जाहीर विधान करण्यात आली. एकीकडे पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक आणि दुसरीकडे कर्नाटक भाजपमधील अंतर्गत वाद अशी स्थिती निर्माण झाली. पक्षश्रेष्ठींनी दरवेळी मंत्रिमंडळाचा विषय टोलवला.
आता भाजपचा कार्यकाळ वर्षभराचा आहे. त्यामुळे आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रलंबित विषय निकाली लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा आखला आहे. ते परतल्यानंतर पक्षामध्ये आवश्यक बदल दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 16 आणि 17 एप्रिल रोजी विजनयनगर जिल्ह्यात होणार आहे. ही बैठक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्याआधी प्रदेश भाजप नेत्यांची ते विशेष बैठक घेणार आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यामुळे पक्ष आणखी बळकट झाला आहे. आता कर्नाटकात मुदतपूर्व निवडणूक घेऊन पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील नेते, कार्यकर्ते निवडणुकीसाठी उत्सुक असून योग्य वेळ पाहून याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप वरिष्ठ अमित शहा यांनी कर्नाटक दौरा केला. त्यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. आगामी आठ दिवसांत प्रदेश भाजपची स्थिती सुधारण्याची सूचना त्यांनी दिली. त्यानंतर नवे उद्दिष्ट देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा सुरु आहे. सध्या निवडणुकीला सामोरे गेल्यास पक्षाची क्षमता उघड होईल. याविषयी आठवडाभरात फोन करुन कळवण्याचे अमित शहा यांनी कळवल्याचे समजते.