पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी. अन्यथा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमचा गट पुढील निर्णय घेईल, असा इशारा शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिला आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा होती. पण, हा शिवसैनिक सामान्य कुटुंबातील व्हावा, असे बाळासाहेब ठाकरेंना वाटत होते, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
बंडखोर आमदारांच्या एकनाथ शिंदे गटात सामिल झालेले आमदार दीपक केसरकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हवे होते. त्यानुसार मुख्यमंत्री पदाची अडीच वर्षे पुर्ण झाली आहेत. आता भाजपमध्ये जायला काय हरकत आहे, असा सवाल देखिल यावेळी केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी शिवसेनेने भाजपसोबत नैसर्गिक युती करावी, असेही दीपक केसरकर म्हणाले.
केसकरांची कोलांटीउडी
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा गट शिवसेनेतून फूटून आधी सुरत येथे गेला. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम आसाम मधील गुवाहटी येथे हलवला. या दरम्यान आमदार केसरकर हे मुंबई येथेच होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला हजर देखिल होते. त्या बैठकीनंतर ते बाहेर पडाले. यावेळी काही शिवसैनिकांनी त्याना अडविण्याचा प्रयत्न देखिल केला होता. यावेळी आमदार केसकर यांनी आपण पक्षप्रमुखांना कल्पना देऊन काही कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगत तेथून काढता पाय घेतला. यानंतर आमदार केसकर थेट गुवाहटी गाठत बंडखोर शिंदे गटात सामिल झाले.
आमदार यामिनी जाधव यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या महिला आमदार यामिनी जाधव यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यामिनी जाधव यावेळी बोलताना म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यांपासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं वादळ आलं. यामुळे माझे संपूर्ण कुटुंब हादरले. मला कॅन्सर झाला असल्याची माहिती यशवंत जाधव यांनी पक्षाला दिली होती. हे समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचारपूस करायला येतील, अशी माझी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेतील नेत्यांकडून आम्हाला कोणीही आधार मिळाला नाही.