![amritpal singh](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2Famritpal-singh.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाइन डेस्क : Amrutpal Singh : खलिस्तान समर्थक 'भगोड्या' अमृतपालने सर्जरी केली होती, अशी माहिती सध्या पुढे येत आहे. 'वारीस दे पंजाब' या संघटनेचा प्रमुख असलेला अमृतपाल अद्यापही फरार आहे आणि पोलिस त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी या अमृतपालने एक व्हिडिओ प्रसारित केला होता. ज्यामध्ये त्याने पोलिसांना उघड आव्हान दिले होते. माझी अटक फक्त वाहे गुरुंच्या हातात आहे, वाहे गुरुंनीच मला पोलिसांच्या तावडीत सापडण्यापासून बचावले आहे, असे म्हटले होते. त्या व्हिडिओनंतर आता अमृतपालच्या सर्जरीची बातमी सर्वत्र फिरत आहे.
अमृतपाल सिंह विषयी एक नवी माहिती समोर येत आहे. भारतात येण्यापूर्वी तो जॉर्जिया येथे गेला होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने जॉर्जिया येथे खलिस्तानसाठी आयएसआय आणि खलिस्तानवाद्यांकडून ट्रेनिंग घेतले होते. त्याचवेळी त्याने तिथे दहशतवादी आणि खलिस्तानची मागणी करणारा भिंद्रनवाले याच्यासारखे दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली होती, अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे.
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, दिब्रुगडच्या सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या अमृतपाल सिंगच्या जवळच्या नातेवाईकांनी चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे. फरारी खलिस्तान समर्थक अमृतपालने जॉर्जियामध्ये दोन महिने काढल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी सांगितले की, अटकेत असलेल्या त्याच्या साथीदारांनी गुप्तचर अधिकाऱ्यांना सांगितले की अमृतपाल जॉर्जियाला भिंद्रनवालेसारखे दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी गेला होता. मात्र, पोलिसांनी आम्ही त्याची चौकशी करत आहोत, असे सांगितले.
तर एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या डोळ्यात काहीतरी समस्या असल्याने त्याने डोळ्यांची सर्जरी केली होती, अशी देखील माहिती त्याच्या काही साथीदारांनी दिली आहे.
विशेष म्हणजे अकाल तख्तची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी भटिंडा येथे होणार असून, त्यावर फरारी अमृतपाल बारीक लक्ष ठेवून आहे. कारण अमृतपालवर अकाल तख्तच्या जत्थेदारांची भूमिका काय असेल, याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतो. या संपूर्ण घटनेवर पंजाब पोलीस लक्ष ठेवून आहेत.
पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, सर्व राजपत्रित अधिकारी (जीओ), नॉन-राजपत्रित अधिकारी (एनजीओ) आणि ईपीओ यांच्या सुट्या १४ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 14 एप्रिल 2023 पर्यंत कोणत्याही प्रकारची नवीन रजा मंजूर करू नये असे प्रमुखांना सांगण्यात आले आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या सर्व प्रकारच्या रजा तत्काळ रद्द कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :