विटा, पुढारी वृत्तसेवा : Ajit Pawar-Vaibhav Patil : विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खानापूर, आटपाडीसह अन्य भागातील शेतकरी तसेच लोकांच्या समस्या मांडल्या. तसेच या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. याशिवाय अजित पवार आणि वैभव पाटलांमध्ये राजकीय चर्चा देखील झाली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फारकत घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय विट्यातील पाटील गटाचे युवा नेते, वैभव पाटील यांनी घेतला. त्यानंतर वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय मोहिते, लेंगरेचे माजी सरपंच प्रशांत सावंत, शहराध्यक्ष अविनाश चोथे, युवा नेते विनोद पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी खानापूर, आटपाडी, तासगांव तालुक्यावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सवलती देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी केली. तसेच 'खानापूर' मध्ये लक्ष द्यावे लागणार, असेही सांगितले.
अजित पवार यांनी वैभव पाटील यांना "काळजी करू नका, मी आहे. तुम्ही लोकांचे प्रश्न घेऊन या, आपण सोडवणूक करू. काम करीत रहा, लोकांच्यात मिसळून काम करा, असे सांगत प्रशासकीय पातळीवर तुम्हाला अडचण येणार नाही. सांगली जिल्ह्याची जबाबदारी आपण स्वतः घेतली आहे. त्यामुळे तुम्ही कामात रहा, बाकीचे मी बघतो असे आश्वासन वैभव पाटील यांना दिले आहे.
हे ही वाचा :