पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकीय पोस्टमुळे प्रसिध्द अभिनेते किरण माने यांना एका वाहिनीवरील मालिकेतून काढण्यात आले. 'मुलगी झाली हो' या मालिकेत अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र लोकप्रिय झाले होते. (kiran mane)
अभिनेता किरण माने हे त्यांच्या फेसबुक पेजवरुन अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य करत असतात. त्यातच त्यांची एक राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे किरण माने यांना संबंधित मालिकेतून वगळण्यात आले. दरम्यान, किरण माने यांनी आपल्या बोलण्याची शैली थांबवली नाही. त्यांनी फेसबुकवर नवीन पोस्ट केली आहे.
आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रोडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..
… आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्रोडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच !
पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !
मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !
तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!! अशा आशयाची पोस्ट करत त्यांनी थेट आव्हान दिले आहे.
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत कलाकार किरण माने काम करत होते. पण त्यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं. त्यानंतर किरण माने यांनी राजकीय भूमिकेबाबत फेसबुकवर व्यक्त झाल्यानं आपल्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला. किरण मानेंच्या या दाव्यानंतर अनेक नेत्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभी राहिली आहेत.