शिवरायांचे कार्य पुढे नेण्याचा मोदींचा ध्यास; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भंडारा प्रचारसभेत प्रतिपादन | पुढारी

शिवरायांचे कार्य पुढे नेण्याचा मोदींचा ध्यास; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भंडारा प्रचारसभेत प्रतिपादन

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : आपला देश विदेशी आक्रांतांमुळे त्रस्त झाला होता, तेव्हा महाराष्ट्रात एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामुळे महाराष्ट्रच नाही तर, या देशातील सर्वच प्रदेशांमध्ये समाजाला एक दिशा दाखविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळे या देशातील सर्वच देशवासींयांत त्याच्याबाबत नितांत आदराची भावना आहे. आता त्यांचे हेच कार्य समोर नेण्याचा ध्यास पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे, असे मत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी आज, भंडारा येथील दसरा मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.

योगी यांनी पुढे सांगितले की, संत व समाजसुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करण्याची माझी आकांक्षा आज पूर्ण झाली आहे. ज्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून एक नवीन दृष्टी दिली आहे. त्यालाच आधार माणून आज देशाच्या विकासाचे कार्य होत आहेत. आमच्या उत्तर प्रदेशातील सर्व शहरांमधील वेगवेगळे सण साजरे करण्याची परंपरा आहे. परंतु, अयोध्येच्या भागात बोलीभाषेत राम कधी होळी खेळतील? असे विचारले जात होते. यावर्षी ५०० वर्षांनंतर अयोध्या नगरीत होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यातही सांगण्यासारखे हे आहे की, चार कोटी गरीबांचे घरकुले झाल्यानंतरच रामललांची मंदिरात स्थापना करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा समोर ठेवून मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांनी जे कार्य केले, त्यांच्याही स्वप्नातील भारत घडविण्याचेच कार्य पंतप्रधान मोदी करत आहेत. आज उत्तर प्रदेशात कुठेही उपद्रव नाही तर, उत्सव आहे. आमच्या प्रदेशात अनेक महिने कर्फू लागत नाही, याचेही सामान्यांना कधीकधी आश्चर्यच वाटते, असेही ते म्हणाले.

‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा देऊन मोदींनी जे केले, ते प्रशंसनिय आहे. १४० कोटी भारतवासीयांच्या परिश्रमाचे परिणाम आज समोर दिसत आहेत. मेडिकल कॉलेज, मेट्रो, गरीब कल्याण, मोफत रेशन, आयुष्यमान भारत, जनधन खाते, किसान निधी ह्या सर्व योजना कोणताही भेदभाव न करता राबविण्यात येतात. गरीब, शेतकरी, युवा आणि महिला यांचा विकास झाला तर, या देशाला विकासापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान मोदी यांचे सरकार पुन्हा आल्यावर पहिल्या तीन वर्षातच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आपला भारत देश असेल. त्यावेळी तुम्हा आम्हा सर्वांचे उत्पन्न, रोजगार, महिला, शेतकरी यांचाही त्याच झपाट्याने विकास होईल असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

Back to top button