बीड : गेवराईत भगर पिठातून विषबाधा, अनेकांची प्रकृती बिघडली, धनंजय मुंडेंकडून रूग्‍णांची विचारपूस

भगर पिठातून विषबाधा
भगर पिठातून विषबाधा

गेवराई पुढारी वृत्तसेवा एकादशीच्या दिवशी (गुरूवार) दि.7 मार्च रोजी फराळात भगर पिठाचे पदार्थ खाल्याने शहरातील काही भागात अनेकांची प्रकृती बिघडली. त्यांना विषबाधा झाल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. शहरातील मुख्य भागात असलेल्या शास्त्री चौकातील किराणा दुकानांतून भगर खरेदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बाधितांना गेवराई येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्‍यान परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असल्याबाबतचे वृत्त मुंडे यांना समजले. यावेळी महाशिवरात्रीसाठी परळीकडे निघालेले राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात गेले. या ठिकाणी त्‍यांनी रूग्‍णांची विचारपूस केली. डॉक्‍टरांना तात्‍काळ वैद्‍यकीय उपचार करण्याच्या सूचना करून त्‍यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.

प्राथमिक माहितीनुसार, बाधित रूग्‍ण 3 च्या आसपास आहेत. एकादशी असल्याने भगर पिठाचे पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, हात, पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. यानंतर त्‍यांना शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.

दिवसेंदिवस होत असलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भगरीतून विष बाधा होणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणे असाच प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अन्नपुरवठा भेसळ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेवराई शहरातील सर्व किराणा दुकानाकडे लक्ष घालून होत असलेली विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी होत आहे.

दरम्‍यान मुंबईवरून आपले दिवसभराचे कामकाज आटोपून छत्रपती संभाजीनगर मार्गे बीड वरून महाशिवरात्रीसाठी परळीकडे निघालेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात येऊन पोहोचले.

परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असल्याबाबतचे वृत्त मुंडे यांना समजले. धनंजय मुंडे यांनी आपला परळीच्या दिशेने निघालेला ताफा थेट अंबाजोगाईकडे वळवत, स्वाराती मध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या चौकशीसाठी मध्यरात्री येऊन भेट देत विचारपूस केली.

राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दिवस आज सकाळी नऊच्या सुमारास सुरू झाला होता. दिवसभर विविध शासकीय कामकाज, बीड रेल्वे संदर्भातील बैठक, त्याचबरोबर महा ऍग्रो ॲपचे अनावरण यांसह विविध शासकीय कामकाज आटोपून सायंकाळी धनंजय मुंडे हे महाशिवरात्री असल्याने परळीकडे निघाले होते.

मध्यरात्री 12 वाजण्याच्या आधी जाऊन शिवरात्री निमित्त परळी येथील प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घ्यायचे या हेतूने परळीच्या दिशेने निघाले हाेते. धनंजय मुंडे यांना निरपणा गावातील काही जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त समजले, त्याबरोबर त्यांनी आपला ताफा अंबाजोगाईकडे वळवत आधी मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे समजले व दर्शन घेणे पुढे ढकलले!

दरम्यान धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे जाऊन निरपणा गावातील अन्नातून विषबाधा झालेल्या सर्वच रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांना धीर दिला, तसेच त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या; तसेच सदर रुग्णांना भगरीतून विषबाधा झाली असल्याने याबाबत योग्य चौकशी करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी अन्न भेसळ व सुरक्षा अधिकारी श्री देवरे यांना दूरध्वनीवरून दिले. यावेळी स्वारातीचे डीन डॉ.धपाटे, डॉ. मोगरेकर, डॉ.चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, तानाजी देशमुख, विश्वंभर फड, रणजित चाचा लोमटे, अजित गरड यांसह आदी उपस्थित होते.

सर्वच रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टर योग्य ते उपचार करत असल्याचे अधिष्ठाता डॉ.मोगरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news