अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आपल्याला निमंत्रण नसल्याचे सांगत शरद पवारांनी भाजपवर राम मंदिराच्या मुद्द्यावरून बोचरी टीका केली. अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधत असताना ते म्हणाले, राम मंदिर उभारणीत अनेकांचे योगदान आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या एकट्या भाजपने त्याचे श्रेय घेऊन राजकारण करू नये, अशा आशयाचे विधान त्यांनी केले.
अयोध्येत राम मंदिर उभारले गेले, याचा आपल्याला आनंद आहे. मात्र, अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण आपल्याला नाही. तसेही पूजा-अर्चना ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी सहसा मी जात नाही. प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा असते. त्याला आपला विरोध नाही, असेही पवार यांनी सांगितले.
सत्ताधारी भाजप कडे सामान्य जनतेसाठी कोणताही कार्यक्रम नाही. त्यामुळे ते राम मंदिराचा मुद्दा पुढे करत आहे असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीमध्ये यावे, तसेच मायावती यांना देखील इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ईडी, सीबीआयचा वापर करून एजन्सीचा फायदा घेऊन राजकारण सुरू आहे, अशी टीका देखील शरद पवारांनी यावेळी केली.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार दोन दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी आज अमरावती येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला.