युवक, शेतकरी प्रश्नी दुर्लक्ष सरकारला महागात पडेल : शरद पवार | पुढारी

युवक, शेतकरी प्रश्नी दुर्लक्ष सरकारला महागात पडेल : शरद पवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : युवकांचे भवितव्य, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार असाल तर त्याची किंमत मोजावीच लागेल हा इशारा युवा संघर्ष यात्रेने दिला आहे. युवा शक्ती काय करू शकते हे दाखवून दिल्याशिवाय ते शांत राहणार नाहीत असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. १२) दिला.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर अशा 800 किलोमीटरच्या विधान भवनांवर धडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेचा आज मंगळवारी सायंकाळी नागपुरात टेकडी रोडवर समारोप झाला. या सांगता सभेला प्रमुख अतिथी म्हणून ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे,एकनाथ खडसे, आमदार रोहित पवार, आमदार रोहित पाटील, भारत पवार, संदीप क्षीरसागर, राजेश टोपे, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रकाश गजभिये, शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे, राजाभाऊ टाकसाळे आदी अनेक पदाधिकारी व हजारोच्या संख्येने कार्यकर्ते राज्यभरातून आलेले शेतकरी युवक स्त्री- पुरुष सहभागी झाले होते.

अमरावती रोडवर जवाहर वसतीगृह येथून निघालेली ही युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी टेकडी रोडवर अडवली त्यानंतर सभेत रूपांतर करण्यात आले. प्रारंभी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शरद पवार पुढे म्हणाले आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत आरक्षण प्रश्नी विश्वास देण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची आहे. युवकांचे हे प्रश्न निश्चितपणे संसदेत मांडले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, या सभेच्या समारोपानंतर ही संघर्ष यात्रा अधिकच आक्रमक झाली दुययम दर्जाचे अधिकारी ,भाजपचे शहर अध्यक्ष यांना भेटण्यासाठी सरकार पाठवून आमची थट्टा करणार असेल तर आम्हाला विधानभवनात जावेच लागेल, सरकार ऐकणार नसेल तर विधान भवनावर जावेच लागेल, पोलिसांनी लाठीचार्ज केला तरी घाबरून जाऊ नका, आम्ही पुढे राहू तुम्ही आमच्या पाठीमागे राहा या असे आवाहन आ रोहित पवार यांनी प्रारंभी केले. युवा संघर्षे यात्रा ही शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नव्हे तर जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी होती, युवक सिरीयस नाहीत हे बोलणाऱ्यांना यात्रेच्या निमित्ताने उत्तर मिळाले. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही,झुकणार नाही असा इशारा दिला. एकंदरीत या यात्रेची सांगता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षे अधिक तीव्र होणार असल्याचे यानिमित्ताने उघड झाले.

दरम्यान, पोलिसानी मज्जाव केल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले बॅरिकेड तोडून पुढे निघाले. झिरो माईल फ्रीडम पार्क येथे रस्त्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी जमाव नियंत्रण करण्यासाठी वापरल्या जाणारे वरूण,वज्र वाहनासह पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आ रोहित पवार आणि इतरांसह त कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयी नेले. दरम्यान, यावेळी झालेल्या धावपळीत काही कार्यकर्ते जखमी देखील झाल्याचे देखील समजले. आपल्या हक्कासाठी लढताना पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पोलीस मुख्यालयी नेण्यात आल्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिली.

Back to top button