Manoj Jarange Patil : मनाेज जरांगेंच्या लिव्हर आणि किडनीला इन्फेक्शन झाल्याचे निष्पन्न
वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेले नऊ दिवस आमरण उपोषण सुरू होते. काल (गुरूवार) राज्य मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ, कायदेतज्ञ आणि बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने जरांगेंनी आपले उपोषण स्थगित केले. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करून विविध चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये त्यांच्या लिव्हर तसेच किडनीवरही इन्फेक्शन झाल्याचे निष्पन्न झाले.
गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या जरांगे यांनी पाण्यासह उपचारही घेतले नव्हते. त्यामुळे त्यांची तब्येत प्रचंड खालावली होती. काल (गुरूवार) रात्री त्यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. जरांगे पाटील यांच्या पोटात गेले नऊ दिवस अन्नाचा कण आणि पाण्याचा घोटही नसल्याने त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे ते उठून बसूही शकत नव्हते.
काल रात्री उशिरा त्यांच्या रक्त, लघवी तसेच अन्य चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये त्यांच्या लिव्हरवर तसेच किडनीवरही इन्फेक्शन झाल्याचे निष्पन्न झाले.तसेच रक्ताच्या चाचण्यात अनेक घटकांचे प्रमाण वाढले असल्याचे आढळून आले आहे. बिलीरुबिनची पातळी वाढली आहे. त्यामुळे पित्ताचे प्रमाण वाढल्याने कावीळ ही उदभवू शकते.
बिलीरुबिन म्हणजे काय?
बिलीरुबिन हा पिवळ्या रंगाचा पदार्थ आहे. जो यकृतामध्ये असलेल्या पित्त द्रवामध्ये आढळतो. ज्याला पित्त असे म्हणतात.
बिलीरुबिन का वाढतो?
बिलीरुबिनची पातळी अनेक कारणांमुळे वाढू शकते.जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण वाढले, असेल तर त्यामुळे त्याला यकृताशी संबंधित आजार होऊ शकतो असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रक्तातील युरिया म्हणजेच नायट्रोजनचे प्रमाण हे वाढले आहे. तसेच क्रियाटीन मध्येही वाढ झाली आहे. या सर्व तपासण्या गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डॉ. विनोद तावरे यांनी केल्या आहेत.जरांगे पाटील यांना अशक्तपणा तसेच तापाची कणकण, घशाचा संसर्ग असल्याने त्यांना प्रतिजैविक आणि टॉनिक हे सलाईन द्वारे देण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्यामुळे त्यांना सक्तीचा आराम सांगितला आहे. रूग्णालयात भेटायला येणाऱ्यांनाही प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
मागील वेळी उपचारार्थ दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी रुग्णालयात रांगा लागल्या होत्या. इन्फेक्शनमध्ये परत वाढ होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून भेटण्यास सध्या प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यांच्या मोजक्या सहकार्यां शिवाय इतर कोणालाही त्यांना भेटू दिले जात नाही.