बांगलादेशात जाणारा संत्रा अडल्याने संत्रा उत्पादकांवर फेकून देण्याची वेळ | पुढारी

बांगलादेशात जाणारा संत्रा अडल्याने संत्रा उत्पादकांवर फेकून देण्याची वेळ

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी सध्या संत्री फेकून देत आहेत. बांगलादेशने भारतातून त्यांच्या देशात आयात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्क 140 टक्के वाढवले आहे. त्यामुळे बांगलादेशात विदर्भातील संत्री महाग होऊन त्यांच्या पुरवठ्यात कमालीची घट आली आहे.

विदर्भातून रोज 50 ते 60 ट्रक संत्री बांगलादेशला जात होते. आता फक्त 5 ते 10 ट्रक संत्री बांगलादेशात जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रोज 50 ट्रक संत्री भारतातील बाजारपेठेत अतिरिक्त राहत असल्याने कोणीही खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षापासून हे आयात कर वाढविल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पन्न घटल्याने 2 ते 3 लाखांचे नुकसान शेतकऱ्यांना होत आहे अशी माहिती शेतकरी अनंत सोंबरसे, संत्रा व्यापारी अनिल धारकर यांनी दिली. दरम्यान, अलिकडेच यासंदर्भात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे माध्यमांशी बोलताना लक्ष वेधले असता, आपले सर्वांशी संबंध चांगले असल्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, शेवटी कुठल्या देशाने किती आयात शुल्क ठेवायचे हा त्यांचा अधिकार असल्याचे गडकरींनी स्पष्ट केल्याने संत्रा उत्पादकांना दिलासा कसा मिळणार, हा प्रश्न कायम आहे.

Back to top button