ब्रेकिंग : बीडमध्ये संचारबंदी लागू; मराठा आरक्षणाबाबतच्या उद्रेकानंतर प्रशासनाचा निर्णय | पुढारी

ब्रेकिंग : बीडमध्ये संचारबंदी लागू; मराठा आरक्षणाबाबतच्या उद्रेकानंतर प्रशासनाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाबाबतच्या उद्रेकानंतर प्रशासनाने बीडमध्ये संचारबंदी लागू केली आहे. ज्याअर्थी बीड जिल्ह्यात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करत असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. मी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये एकतर्फी बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयांपासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत शिवाय, राष्ट्रीय महामार्गावरही पुढील आदेशांपर्यंत संचारबंदी लागू करत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाळपोळ आणि तोडफोड होत आहे. आमचे आंदोलक शांततेत आंदोलन करत असून सत्ताधाऱ्यांचेच लोक आंदोलन चिघळवण्यासाठी हा प्रकार करत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, संचारबंदीचा निर्णय घेत प्रशासनाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या जाळपोळीमागे कोण आहे?  याचा मी शोध घेतो असेही जरांगे-पाटील म्हणाले. जाळपोळीला माझं समर्थन नाही. आजपासून जाळपोळ तोडफोड बंद झाली पाहिजे. अन्यथा मला उद्या दुसरा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जरांगे यांनी आंदोलकांना दिला आहे.

बीड पेटले; राष्ट्रवादी कार्यालयासह क्षीरसागर काका -पुतण्याचे घर पेटवले

मराठा आरक्षण प्रश्न सोमवारी (दी.30) सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांचे घर, नगरपरिषद कार्यालय याला आग लावली. दुपारनंतर बीड येथे मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर,  हॉटेल सनराईज, महावीर हॉस्पिटल व इतर काही इमारती पेटवून देण्यात आली आहे. इतरही ठिकाणी जाळपोळ केली आहे. दगडफेक तर संपूर्ण शहरात करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे तीव्र पडसाद बीडमध्ये उमटले आहेत. (Beed Maratha Andolan)

आतापर्यंत अतिशय शांततेत सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनाने सोमवारी उग्ररूप धारण केले. माजलगाव येथे प्रकाश सोळंके यांचे घर, नगरपरिषद, पंचायत कार्यालय येथे आग लावल्यानंतर दुपारी बीड येथे मराठा समाजाचे आंदोलन आक्रमक आंदोलन करत होते. सुरुवातीला पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून कुलूप ठोकण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद, नगरपरिषद येथे आंदोलन करण्यात आले. यानंतर बीड शहरातील प्रमुख रस्ता असलेला सुभाष रोड बॅरिकेट आडवे टाकून वाढवण्यात आला. सायंकाळच्या सुमारास मराठा आंदोलक अधिकच आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी बीड येथील राष्ट्रवादी भवनाला आग लावली. यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ऑफिस आंदोलकांनी पेटवले.

 

हेही वाचलंत का?

 

Back to top button