Manoj Jarange Patil : जिंतूर तालुक्यात मनोज जरांगे-पाटलांची यांची तोफ धडकणार
जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तब्बल १७ दिवस उपोषण करून राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण दिले नाही, तर पुढील दिशा काय असेल यासाठी मनोज जरांगे पाटील मराठवाडा दौरा करणार आहेत. या निमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने दि. ३० सप्टेंबर रोजी जिंतूर शहरात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही सभा पार पडणार आहे. मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सरटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी तब्बल १७ दिवस उपोषण केले होते याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसाचा वेळ मागून घेतला होता म्हणून उपोषण सोडून त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन चालु ठेवले होते दरम्यान राज्य सरकारने मागितलेला चाळीस दिवसाचा वेळ १४ ऑक्टोबर रोजी संपत आहे म्हणून दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले नाही तर पुढील दिशा काय असेल यासाठी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे याच दौऱ्यात जिंतूर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.