खारेपाटण-तावडे वाडी येथे भूस्खलन; डोंगर भागातील ६ कुटुंबासह ३३ जणांचे स्थलांतरित

खारेपाटण-तावडे वाडी येथे भूस्खलन; डोंगर भागातील ६ कुटुंबासह ३३ जणांचे स्थलांतरित

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : कणकवली तालुक्यातील खारेपाटणजवळ असलेल्या डोंगर भागातील तावडे वाडी येथे आज (दि. ९) पहाटे जमिनीला भेगा आणि काही प्रमाणत दरड कोसळल्याचे आढळून आले. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल यंत्रणेकडून कणकवली तहसीलदार दीक्षित देशपांडे, नायब तहसीलदार राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खारेपाटण तावडे वाडी येथील रहिवासी असलेले बांधव आपल्या आपल्या कुटुंबासह या डोंगर भागात गेली १४ वर्षापासून राहत असून येथे त्यांची ५ घरे असून ६ कुटुंबासह ३३ माणसे येथे राहत आहेत परंतु काल पासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने येथील डोंगरी व जंगल भागात राहत असलेल्या या नागरिकांच्या घराना पहाटे तडे गेले असून काही काही प्रमाणात दरडी भाग कोसळत आहे यामुळे या घराना मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यात मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.

घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच प्राची ईस्वलकर यांनी याठिकाणी प्रथम भेट देत नागरिकांना दिलासा दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, नडगिवे सरपंच भूषण कांबळे,खरेपाटण सर्कल म एस आर बावलेकर, तलाठी के सिंगणाथ, खारेपाटण पोलीस पाटील दिगंबर भालेकर, नडगिवे पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, खारेपाटण तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत यांनी देखील घटनास्थळी भेट दिली व भूस्खलनाची पाहणी केली.

"आम्ही व्यवसायानिमित्त भटकत असलेली विस्थापित मोलमजुरी व मासेविक्री करून पोट भरणारे घोरपी समाजाची कुटुंबे असून आम्हला जिथे जागा मिळाली. तिथे आम्ही सद्या राहत आहोत.मात्र आमच्या जिवितला आता याठिकाणी धोका निर्माण झाला असून सरकारने आमचे पुनर्वसन करून आम्हाला पक्की घरे बांधून द्यावीत अशी आमची मागणी आहे."
– सदा तावडे, स्थानिक रहिवासी

"तावडेवाडी येथील नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून सदर नागरिकांची सद्या राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीत करण्यात येईल.मात्र प्रशासनाने येथील नागरिकांच्या पुनर्वसन बाबत गांभीर्याने विचार करावा.स्थानिक ग्रामपंचायत म्हणून आम्ही सहकार्य करू."
– प्राची ईसवलकर, सरपंच,खारेपाटण

प्रशासनाने अशा डोंगर दरी वस्तीत राहणाऱ्या नागरिकाचा सर्व्हे करून धोक्याच्या ठीकाणी त्यांना न ठेवता सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे अशी मागणी आता ग्रमस्थांकदडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news