Konkan sailor missing : रत्नागिरी येथे खोल समुद्रात गेलेली बोट 6 खलाशांसह बेपत्ता | पुढारी

Konkan sailor missing : रत्नागिरी येथे खोल समुद्रात गेलेली बोट 6 खलाशांसह बेपत्ता

शृंगारतळी : पुढारी वृत्तसेवा

जयगड तालुका रत्नागिरी येथील मच्छी व्यावसायिक यांची मच्छीमारी करणारी बोट चार खलाशी व दोन तांडेल घेऊन 26 ऑक्टोबर रोजी मासेमारीकरिता खोल समुद्रात गेली असून ती अद्याप परत आलेली नाही. याबाबतची तक्रार जयगड पोलिस ठाण्यामध्ये नौका मालकाच्या पत्नीने दाखल केली आहे. (Konkan sailor missing)

जयगड पोलिस ठाण्यात मुनताह मुहम्मद शरीफ टेमकर (वय 43, रा. जयगड) यांनी जयगड पोलिस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या मालकीची नौका नवेद ही मत्सव्यवसाय आयुक्तांकडे नोंद केलेली बोट 26 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता समुद्रात मासेमारी करण्याकरिता गेली होती.

Konkan sailor missing : २६ ऑक्टोबरपासून खलाशी गायब

या नौकेवर खलाशी व तांडेल दगडू गोविंद नाटेकर, गोकुळ तुकाराम नाटेकर, अनिल गोविंद आंबेकर, सुरेश धाकू कांबळे (सर्व, रा. गुहागर) तालुक्यातील साखरीआगर गावाचे रहिवासी असून दत्तात्रय सुरेश झगडे (रा. अडूर) व अमोल गोविंद जाधव (रा. मासू) असे सहाही खलाशी व तांडेल गुहागर तालुक्यातील आहेत. हे सर्वजण 26 ऑक्टोबर रोजी मच्छीमारीसाठी गेले होते.

या नौकेच्या शोधासाठी याच मालकाच्या दुसर्‍या बोटीच्या वायरलेसवरून खलाशांशी संपर्क साधला असता आम्ही आता दाभोळच्या उपर आहे, असे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर या बोटीशी कोणताही संपर्क झालेला नाही, असे बोटमालक मुनताह मुहम्मद शरीफ टेमकर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. या घटनेला चार दिवस होऊन गेले असून या

बोटीचा व त्यावरील खलाशांचा कसल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. तरी या बोटीचा व त्यावरील खलाशांचा शोध घेण्यात यावा अशी विनंती या जबाबात केली आहे.

या घटनेची नोंद रत्नागिरी तालुक्यात जयगड सागरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या नौकेचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिस, स्थानिक मच्छिमार, कोस्टगार्ड, नौका विभाग रत्नागिरी हे घेत असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेसवरून या नौकेची माहिती देण्यात आली असल्याचे जयगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक केळकर यांनी सांगितले.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात यलो अ‍ॅलर्ट

दिवाळीच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी राज्यातील काही भागांत पावसाला सुरुवात होत असून कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात 1 व 2 नोव्हेंबरला यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरासह तामिळनाडू, केरळ, आंध— प्रदेश आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील काही भागांत शुक्रवारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होईल. त्यापुढे दिवाळीच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी 1 व 2 नोव्हेंबरला कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात यलो अ‍ॅलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

दरम्यान, राज्यात ज्या भागात पावसाचा इशारा दिला आहे, त्या भागातील किमान तापमानात घट झालेली नाही. यात कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत.

Back to top button