Raju Shetti : राज्यात १ जुलैपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियान’- राजू शेट्टी

Raju Shetti : राज्यात १ जुलैपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियान’- राजू शेट्टी
Published on
Updated on

महाड; पुढारी वृत्तसेवा: भारताला महासत्ता होण्यासाठी जगाची बाजारपेठ ताब्यात ठेवावी लागेल. त्यासाठी देशातील शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकरिता सकारात्मक पद्धतीने विचार करून कायदे अनुकूल करावे लागतील, असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी व्यक्त केले. महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर या 90 दिवसांच्या काळात 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियान' संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात आज (दि.३०) कृषी दिनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी एका विशेष कार्यक्रमातून करण्यात आली. या संदर्भात माहिती देण्यासाठी महाडच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितले की, जगातील पहिल्या पाच देशांमध्ये देशाची अर्थव्यवस्था समाविष्ट झाल्याचा आनंद आहे. यासाठी शेतकऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. केवळ शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच लोकसभेने मंजूर केलेले तीन कायदे मागे घ्यावे लागले. वैश्विक तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मोठा फरक पडला आहे. पूर्वी शेती उत्पादन शाश्वत होते. मात्र, हायब्रीड वाणामुळे ते शाश्वत राहिलेले नाही. बियाणे व पेस्टिसाइड्स या स्वतंत्र दोन लॉबी सध्या कार्यरत आहेत. त्यांच्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी शासन गंभीर नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी शासन तत्पर असते, अशी टीका शेट्टी यांनी यावेळी केली.

Raju Shetti : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्यातील शासनाचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. तत्कालीन ठाकरे यांचे शासन घरातून तर शिंदे यांचे शासन बाहेरून चालत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले नाहीत. किंबहुना जमिनीच्या चौपट मोबदल्यासंदर्भात तत्कालीन महसूल मंत्र्यांनी केलेला बदल हा दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्यांची तयारी असल्यास त्यांच्या जमिनी परप्रांतीयांच्या ताब्यातून परत घेण्यासाठी स्वाभिमानी संघटना आंदोलन उभे करेल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी 23 ऑक्टोबर 1662, 19 मे 1676 आणि 5 सप्टेंबर 1676 मध्ये आज्ञापत्र केले होते. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांवर व्याजाची सक्ती न करता त्यांना अन्य मार्गाने सहकार्य करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण महत्त्वाचे होते. हा आदर्श समोर ठेवून छत्रपतींचे आशीर्वाद घेऊन आपण शेतकरी जागृती अभियान सुरू करत आहे. हजारो शेतकरी बांधव स्वखर्चाने या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news