उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

अलिबाग ; पुढारी वृत्‍तसेवा खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा प्रशासनाने दिलेली माहिती :

(रविवार)16 एप्रिल रोजी खारघर, नवी मुंबई, जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. तथापी या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यामुळे 8 महिला व तीन पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून, 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

मृतांपैकी 8 मृतांची ओळख पटलेली असून, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1) श्रीमती वायचळ 2) तुकाराम वांगडे 3) महेश गायकर 4) मंजुषा भाबंडे 5) स्वप्नील केणे 6) संगीता पवार 7) जयश्री पाटील 8) भीमा साळवी, अशी नावे आहेत. उर्वरित 3 मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी "हरवले व सापडले" समितीचे प्रमुख 7977314031 व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 022-27542399 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news