राहुरी ; पुढारी वृत्तसेवा
देशाचे गृहमंत्री अमित शहा नगर जिल्हा दौर्यावर असतानाच राहुरी येथील मोक्का गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या गुन्हेगारांसह पाच जणांनी जेलमधून पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. जेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून पळून जाणार्या पाच जणांपैकी तीन जणांना पोलिसांनी पकडले आहे. तर उर्वरीत दोघे आरोपी फरार झाल्याने पोलिस प्रशासनाकडून जिल्हाभर शोध सुरू आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी तातडीने धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली.
नगर व पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ उडवून टाकणारे सागर भांड टोळीतील आरोपींना दरोडा प्रकरणात पोलिसांनी शिताफीने पकडले होते. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला सागर भांड व त्याच्या साथीदारांनी अनेक ठिकाणी दरोडे, चोरी, दहशत निर्माण करणे, गावठी कट्यांचा वापर करून सर्वसामान्यांना जेरीस आणणे आदी प्रकार केल्याचे विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून समोर आले होते. अशा आरोपींना राहुरी पोलिस ठाण्यात असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आलेले होते.
दरम्यान, शुक्रवारी मध्य रात्रीच्या वेळी भांड प्रकरणातील आरोपींनी पळून जाण्याचा बेत आखला. जेलमध्ये पाठीमागील बाजुला असलेल्या खिडकीचे गज या आरोपींनी कापले. आरोपींनी रात्रीतून जेलमधून पळ काढला. दरम्यान, पाचजण लपून पळत असल्याचे रात्रीची गस्त घालणार्या पोलिस प्रशासनाच्या लक्षात आले. सहायक पोलिस निरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे, दीपक फुंदे, विकास साळवे, देविदास कोकाटे, रंगनाथ ताके, कोळगे यांनी पाणी टाकी परिसरात सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. यामध्ये सागर भांड, किरण अजबे हे दोघेजण पोलिसांच्या हाती लागले. तर रविंद्र उर्फ रवी पोपट लोंढे, नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी, जालिंदर सगळगिळे हे आरोपी फरार झाले आहेत.
त्यामुळे राहुरी पोलिस ठाण्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. प्रकरणामध्ये सागर भांड टोळीतील नितिन उर्फ सोन्या माळी यांच्यावर मोक्का अंतर्गत नुकतीच कारवाई करण्यात आलेली होती.
गुहमंत्री शहा हे नगर जिल्हा दौर्यावर असल्याने पोलिस प्रशासन व्यस्त होते. त्याचा गैरफायदा घेत संबंधित आरोपींनी पळून जाण्याचा बेत आखल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेच्या कामकाजाबाबत टीका होत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील या प्रकरणाबाबत काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.